फुलझरी येथील नागरिकांची रोजगारासाठी भटकंती

आंदोलनकाळात सोबत असणारे नेते अचानक झाले गायब

मुल (प्रतिनिधी) : – वनविभागाच्या बफर क्षेत्रातील फुलझरीच्या जंगलात वाघाच्या हल्यात एका युवकाचा जिव गेला, सदर घटना वनविभागाला संशयास्पद वाटल्याने, वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी फुलझरी आणि डोणीच्या काही युवकाना वनविभागाच्या कार्यालयात आणुन चौकशी केली, दरम्यान काही नेते फुलझरी आणि डोणीच्या नागरीकांना घेवुन आंदोलन केले, यावेळी ते सोबत होते मात्र फुलझरीच्या नांगरीकांचा रोजगार गेला, मग आता हेच नेते कोणत्या बिळात लपुन बसले असा संतप्त सवाल फुलझरीचे नागरीक करीत आहे.

धानपिसाई करण्यासाठी चिरोली येथे गेलेल्या डोणी येथील युवक फुलझरी मार्गे डोणीला जात असताना एक महिन्यापूर्वी मौजा डोनी येथील भारत कोवे हा युवक फुलझरी मार्गावर वाघाच्या हल्ल्यात ठार झाला, सदर घटनेची वनविभागाकडुन चौकशी करीत असताना, घटनेबाबत शंका निर्माण झाल्याने फुलझरी व डोनी येथील काही नागरिकांना वनविभागाच्या कार्यालयात आणुन चौकशी केली, व दुसऱ्या दिवशी त्याना घरी सोडुन देण्यात आले, दरम्यान गावकऱ्याना घेवुन काही नेते वनविभागाविरोधात आंदोलन केले, तर आशिष नैताम या युवकाने वनविभागाच्या काही अधिकाऱ्याविरोधात पोलिसात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती, यावेळी काही नेत्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केलेले होते परंतु अल्पावधीतच तक्रार करणाऱ्या आशिष नैताम ने वनविभाग आमच्यावर गुन्हे दाखल करणार या भीतीने तक्रार दिली होती परंतु ती तक्रार गैरसमजुती ने दिली असल्याचे मान्य करत सदर तक्रार परत घेत असल्याचे शपथपत्र लिहुन दिले आणि याप्रकरणाला पुर्णविराम मिळाला.

सदर प्रकरणानंतर वनविभागामध्ये सुरू असलेले अनेक कामे बंद झाल्याने फुलझरीच्या नागरीकांना रोजगारासाठी वणवण भटकण्याची पाळी आली आहे. मात्र ज्या नेत्यानी आंदोलनाची भुमीका घेत नागरीकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले ते नेते आता कुठे जावुन बसले आहेत. याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे.

त्या नेत्यामुळेच वनविभाग आणि नागरीकात दुरावा

मूल तालुक्यातील बफर क्षेत्रातील फुलझरी येथील नागरीक वन विभागाकडून मिळणाऱ्या रोजगारावर पुर्णपणे अवलंबून होते, त्यांना याशिवाय दुसरे रोजगार नाही, फुलझरी येथील नागरीकांचे आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्याचे संबध नेहमीच सलोख्याचे राहिले, अतिक्रमणाच्या मुदयावरून वाद प्रतिवाद व्हायचा परंतु कुठेही गावकरी व वनविभाग यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळालेला नाही. परंतु मागील महिण्यात झालेल्या आंदोलनामुळे वनविभाग आणि नागरीकांमध्ये असलेल्या संबधात दुरावा निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे.

डोणीच्या मजुरांना रोजगार: फुलझरीच्या मजुराना नो एंट्री

वनविभागाने डोणीच्या नागरिकांना वनकुटी आणि बांबु कटाईच्या कामावर घेतले आहे, यामुळे डोणीच्या मजुराना रोजगार मिळालेला आहे, मात्र केसलाघाट येथील जंगलसफारी प्रवेशव्दारावर फुलझरी येथील मजुर वेगवेगळे काम करीत होते, त्यांना याठिकाणी चांगला रोजगार मिळाला होता, मात्र जंगलसफारी प्रवेशव्दार बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळे फुलझरीचे नागरीक तिव्र रोष व्यक्त करीत आहे.